ताजे अपडेट
जमिनीत पाणी मुरविण्यासाठी माण नदीपात्रात नांगरणी
पाण्याची पातळी वाढविण्यासाठी माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचा उपक्रम
सांगोला :पावसाचे पडणारे पाणी माण नदीपात्रातून जमिनीत मुरावे, पर्क्युलेशन वाढून आसपासच्या विहिरी-बोअरला पाणी वाढावे, या उद्देशाने माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणचे माण नदीपात्र नांगरणे किंवा मोठ्या ट्रॅक्टरने फणकाटी मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याचा नक्कीच फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.सन २०१५ साली माणगंगा भ्रमणसेवा संस्थेने माण नदीपात्र नांगरले होते. परंतु, त्यावेळी वाडेगाव बंधाऱ्यातील नदीपात्रात आठ ते तेरा फूट उंचीचा गाळ होता. त्यामुळे त्या वेळची नांगरट फारशी उपयुक्त ठरली नव्हती. सन २०१६ व २०१७ या सालात माण नदीपात्रातील संपूर्ण गाळ काढण्यात आला होत. फक्त वाळूचे थर शिल्लक राहिले होते. नंतरच्या चार-पाच वर्षांत पावसाच्या पाण्याने वाळूच्या थरावर गाळाचे थर साचले आहेत. असे थर साचल्यामुळे गाळ आणि वाळू यांचे मिश्रण झाले की, सिमेंट काँक्रीटप्रमाणे घट्ट थर तयार होतात. त्यामुळे पावसाचे पाणी आले तरी ते वरच्यावर वाहून जाते. घट्ट थरामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. तसेच पर्क्युलेशन पूर्णपणे बंद पडल्यामुळे आसपासच्या विहिरी-बोअरला नदीतून पाणी जात नाही. त्याकरिता नदीपात्रावरील पृष्ठभाग भुसभुशीत करून त्यावरील वाळू- मातीचा घट्ट झालेला थर काढणे आवश्यक असल्याने नदीपात्र नांगरण्यास सुरुवात केल्याचे माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष घोंगडे यांनी सांगितले.नदीपात्र नांगरण्याची तयारी गेल्या सहा महिन्यांपूर्वीपासून केली जात आहे. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना चार महिन्यांपूर्वीच पत्राद्वारे कळविले आहे, अशी माहिती वैजिनाथ घोंगडे यांनी दिली.
‘शक्य असेल तिथे नदी नांगरा’ हा व्हॉटस्अप मेसेज आमच्या वैयक्तिक नंबर व ग्रुपवर टाकून अनेकांनी माहिती पुरवली. त्यातूनही आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. विनंती इतकीच आहे की, नदी नांगरणी अभियान आम्ही सुरू करत आहोत. त्यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या कामासाठी दिली जाणारी देणगी कर सवलतपात्र रक्कम असणार आहे. -वैजिनाथ घोंगडे, अध्यक्ष, माणगंगा भ्रमणसेवा संस्था.